Browsing Category

Articles


VIEW POST

View more
Articles

यशस्वी उद्योजक होण्याची गुरूकिल्ली

By on October 31, 2023

यशस्वी उद्योजक होण्याची गुरूकिल्ली

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलीस महासंचालक

28/10/2023

शुक्ल यजुर्वेदीय माध्यन्दिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान च्या वर्धापन दिना निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमामधे मला सहभागी करून घेतले ह्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी ह्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

 भा. ज. प. महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष लोकप्रिय माजी आमदार मेधा कुलकर्णी, लोकप्रिय अभिनेता संकर्षण कर्‍हाडे, त्रिमूर्ती ऑटोडेको कॉम्पोनन्टस् प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मकरंद जोशी, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्मान्य श्रोते, पत्रकार मित्र व बंधुभगिनींनो, 

सुरवातीलाच लोकप्रिय अभिनेता व कवी संकर्षण कर्‍हाडे ह्यांना सृजन युवा कलाकार पुरस्कार व यशस्वी उद्योजक मकरंद जोशी ह्यांना चंद्रकांत जोशी स्मृती प्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल मी उभयतांचे हार्दिक अभिनंदन करतो. उभयतांच्या यशस्वी प्रवासाबद्दल घेण्यात आलेली प्रकट मुलाखत आत्ता आपण ऐकली व त्यांच्या यशाचे रहस्य समजून घेतले.

यशस्वी कलाकार तसेच यशस्वी उद्योजक व्हायचे असल्यास काही समान गोष्टी अधोरेखित करणे गरजेचे आहे. सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे जी भूमिका आपल्याला पार पाडायची असेल त्याच्याशी पूर्णपणे समरस होणे. ही समरसता तेव्हा प्राप्त करता येते जेव्हा तुम्ही स्वतःला झोकून देऊन त्यातील बारीकसारीक सर्व बाबींचा सखोल अभ्यास करत असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आपण सर्वकाही कारवाई करत असतो मग ते कदाचित प्रेक्षक असतील, श्रोते असतील किंवा कदाचित आपल्या मालाचा वापर करणारे उपभोक्ते असतील त्यांना केंद्रस्‌थानी ठेवून प्रत्येक गोष्ट करणे.. पूर्वी व्यवस्थापन शास्त्रामधे ह्याला customer satisfaction असे म्हटले जायचे. परंतु गेल्या अनेक वर्षात ह्यात प्रगती होऊन सध्या customer excellence ही संकल्पना रूढ होत आहे. ह्याचा अर्थ असा की आपण सादर केलेली कला असो, किंवा सेवा असो, किंवा वस्तु असो ही इतकी उत्तम पाहिजे की, जी ग्राहकांनी कल्पनाही केली नसेल. 

हे जे चोखंदळ ग्राहक असतात ह्यांना कल्पनातीत समाधान देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असलेला मंत्र लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. ‘‘Be Vocal for Local But be Global in your approach!’’ आज कलेच्या क्षेत्रात जरी पाहिले तरीही मराठी भाषिक हे केवळ महाराष्ट्रापर्यंत किंवा भारतापर्यंत मर्यादित नसून जगातील दोनशेपेक्षा अधिक देशांमधे पसरलेले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे आन्तर्जालाच्या माध्यमामधून आज कोणत्याही ठिकाणावरून कोणतीही व्यक्ती तुमचे सादरीकरण पाहत वा ऐकत असते. तसेच तुम्ही निर्माण केलेली वस्तू ही सुद्धा जगातील कुठल्याही देशात पोचत असते. ह्यांचे समाधान करण्यासाठी निर्मात्याने पूर्णपणे पूर्वग्रहदूषितपणा सोडून जगातील कोणत्याही धर्मातील, भाषेतील, जातीतील, जमातीतील, स्त्री-पुरूषांचा विचार करून सादरीकरण करणे आवश्यक आहे. ह्यासाठी आपल्या मनातील इतरांबद्दलचे अनेक पूर्वग्रह आपण प्रयत्नपूर्वक दूर करणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर आपण सादर करीत असलेली कला, सेवा किंवा वस्तू  ही अत्यंत स्पर्धात्मक वातावरणातही यशस्वी करणे जरुरीचे आहे. केवळ दुसर्‍याची नक्कल करून तो यशस्वी झाला म्हणजे आपण यशस्वी होऊ हयाची खात्री नसते. ह्यासाठी तुम्हाला सखोल संशोधन, चिंतन, आवश्यक आहे व त्यातूनच तुम्ही सादर करत असलेल्या गोष्टीची निर्मिती होत असते. व ह्यालाच पेटंट मिळवणे असे संबोधले जाते. अनुकरण करणारे व्यवसाय थोड्याकाळात कदाचित यशस्वी झाल्याचे दिसते पण त्याच वेगानी ते काळाच्या पडद्याआडही जात असतात. परंतु ज्या उद्योजकांनी संशोधनपूर्वक आपले वैशिष्ट्य कायम ठेवले आहे, मिळणार्‍या नफ्यातील कमीतकमी 10%  रक्कम संशोधनासाठी नियमित खर्च केली आहे ते उद्योजक स्पर्धेवर मात करून टिकून राहतात असे दिसते.

यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपण निर्माण केलेल्या सुरवातीच्या गोष्टींमधे अडकून न पडता नवनवीन गोष्टी ग्राहकांपर्यंत पोचविणे व ग्राहकांकडून त्याची मागणी वाढविणे हे कौशल्य आवश्यक आहे. हे करत असताना जाहिरातीचे महत्त्व दुर्लक्ष करून चालणार नाही. माझी वस्तू चांगल आहे. ती कोणीही स्वीकारेल असे समाधान आत्मघातकी ठरू शकते. संस्कृतमधे म्हणतात, ‘‘अप्रकाशिता वार्ता मृता’’ म्हणजे तुम्ही काय केले आहे हे जो पर्यंत तुम्ही जगाला सांगत नाही तोपर्यंत ते लोकांना माहित होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे खोट्या नाण्याची कितीही प्रसिद्धी केली तरी ते लगेचच उघड पडते. ह्यासाठी मुळात तुमचे उत्पादन हे उत्तम पाहिजेच तसेच त्याची किंमतही लोकांना सहज परवडेल अशीही पाहिजे. ह्याचा अर्थ असा नव्हे की ती तुम्ही स्वस्तात द्यावी. ह्यासंबंधी नुकतेच उघडकीस आलेले उदाहरण म्हणजे जेट एअरवेज चे दिवाळे का वाजले हे विचार करण्यासारखे आहे. परवडत नसतानाही प्रत्येक कि.मि. मागे 1 रुपया कमी लावणयाचा निर्णय जेट कंपीचे संचालक गोयल ह्यांनी जाहीर केला. थोडे दिवस काही ग्राहक वाढलेही असतील परंतु एका वर्षातच जेट एअरवेज चे दिवाळे निघाले व कंपनीला कुलूप ठोकावे लागले.

हया सर्व गोष्टींशिवाय यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुम्हाला कंपनीसंबंधीच्या सर्व कायद्यांची माहिती पाहिजे. व कायद्याने सांगितलेले निर्बंध तुम्ही तंतोतंत पाळले पाहिजेत. जसे स्त्री कामगारांची गार्‍हाणी दूर करण्यासाठी विशाखा समितीची स्थापना, बालकामगार प्रतिबंध कायदा, कामगार कल्याणासाठी कामाचे तास नियंत्रित ठेवणे, कामगारांना वेळच्यावेळेस पगार, प्रॉव्हिडंट फंड उपलब्ध करून देणे, त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था ठेवणे इत्यादि.

हे सर्व करत असताना व्यवस्थापन प्रशिक्षणात शिकवलेले धडे पुरेसे नसतात हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील अनेक सुप्रसिद्ध बिझिनेस स्कूलमधुन उत्तम गुण मिळवून बाहेर पडलेले अनेक CEOs तुरुंगात गेलेले दिसतात कारण त्यांच्यामधे पैसे कसे वाढवायचे ह्याची अक्कल होती परंतु नैतिकता नव्हती. नैतिकतेला इंग्रजीत Ethics किंवा Ethical Values म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर हया साठी यशस्वी उद्योजकांनी भारतीय व्यवस्थापन शास्त्र, भगवद्गीतेतील व्यवस्थापन शास्त्र तसेच दासबोधात रामदासस्वामींनी सांगितलेले व्यवस्थापन शास्त्र ह्याचा मुद्दाम अभ्यास करणे आवश्यक आहे. भगवान कृष्णाने गीतेत सांगितल्या प्रमाणे ‘‘यद्दयदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।’’ तसेच आचारः प्रभवो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः । तुमचे स्वतःचे उ्तम आचरण हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

पुन्हा एकदा आजच्या सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून, आयोजकांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो.

——————   —————————–  ————-





VIEW POST

View more
Articles

ड्रग्जच्या विळख्या तरुणाई

By on October 18, 2023

ड्रग्जच्या विळख्या तरुणाई
– प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक


पुण्यातील ससून रुग्णालयात जप्त करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या ड्रग्ज साठा प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रमुख आरोपी ललित पाटील याला नुकतीच अटक केली आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचा विळखा राज्यातच नव्हे तर सबंध देशभरात वाढत चालला आहे. खरे तर हे पाकिस्तानने भारताविरुद्ध छेडलेले छद्मयुद्ध किंवा प्रॉक्सी वॉर आहे. गेल्या वर्षभरात २५ हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी लढायची नाहीये; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे.


पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्स रॅकेट प्रकरणी फरार असणार्‍या ललित पाटील याला नुकतीच अटक करण्यात आली. श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी जेरबंद केले. ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असून २०२० मध्ये तो ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अटक झाल्यापासून ललित प्रदीर्घ काळ ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली होती आणि त्याचा उपयोग करून तो ससूनमधून निसटला होता. अटकेनंतर त्याच्या चौकशीतून ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक, अलीकडील काळात राज्यातच नव्हे तर सबंध देशभरात अमली पदार्थांचा विळखा वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

 
वस्तुतः अमली पदार्थ किंवा ड्रग्ज हा विषय अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरुपाचा आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट स्थापन होण्यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असणार्‍या आयएसआयचा मोलाचा वाटा होता. किंबहुना आयएसआयच्या समर्थनावरुनच तालिबानचे राज्य अफगाणिस्तानात स्थापन झाले. पाकिस्तानची भारताबाबतची रणनीती अत्यंत स्पष्ट आहे. प्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने छद्मयुद्धाचा मार्ग निवडला. त्याअन्वये दहशतवादी कारवाया करुन भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे आणून भारताची प्रगती रोखणे हे धोरण म्हणून पाकिस्तानने स्वीकारले. तथापि, भारताच्या संरक्षण यंत्रणांनी आणि सैन्याने पाकिस्तानचे हे मनसुबे वेळोवेळी हाणून पाडले. आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्येही पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे. ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्’ असे म्हणत भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानचीच कालोघात शकले झाली आणि बांगला देश वेगळा झाला. तेव्हापासून पाकिस्तानने कधी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर कधी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला; परंतु भारत सरकार, भारतीय सैन्य आणि भारतीय जनता या तिघांनी एकत्र येऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत केले.

 भारतातील जनतेला याची शिक्षा द्यायची म्हणून या देशातील तरुणांभोवती अमली पदार्थांचा विळखा घालण्याचे षड्यंत्र आयएसआयने रचले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असण्याबरोबरच सर्वाधिक तरुणांचाही देश आहे. १५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण आपल्या लोकसंख्येमध्ये मोठे आहे. ही तरुणपिढी म्हणजे भारताची संपत्ती आहे. लोकसंख्येच्या परिभाषेत त्यांना ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ असे म्हटले जाते. कार्यकुशल मनुष्यबळाची उपलब्धता हा आर्थिक व औद्योगिक विकासाचा कणा मानला जातो. तरुणपिढीचे हे योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन पाकिस्तानने भारतातील तरुणाईला व्यसनाधिन करुन टाकण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी कधी हवाई मार्गाने, कधी जमिनी मार्गाने किंवा कधी समुद्रमार्गाने पाकिस्तान भारतात अफू, चरस, गांजा, हेरॉईन यांसारख्या अमलीपदार्थ पाठवत आहे. हे प्रमाण साधेसुधे नसून अक्षरशः काही टन अमली पदार्थ पाकिस्तानातून तस्करीच्या मार्गाने भारतात येत आहेत. यातील काही अमली पदार्थांची किंमत ही काही हजारांमध्ये असते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास एक ग्रॅम हेरॉईनची किंमत अफगाणिस्तानातून विकले जाते तेव्हा समजा १०० रुपये असेल तर मुंबईच्या बाजारात ते १० हजारांना विकले जाते. यातून एकीकडे भारतातील समाजव्यवस्थेत विष पेरायचे आणि दुसरीकडे प्रचंड नफा कमवायचा असा दुहेरी डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अन्य काही संस्थांच्या, तपास अधिकार्‍यांच्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे की, अमली पदार्थांच्या व्यापारातून-तस्करीतून मिळालेला पैसा शस्रास्रांचा पुरवठा करण्यासाठी आणि दहशतवादी तत्वांना आर्थिक रसद पुरवण्यासाठी वापरला जातो. म्हणजेच तुमच्याच पैशाने तुमच्याच देशात दहशतवाद पसरवायचा, लोकांना मूलतत्ववादी बनवायचे, लोकांना शस्रास्रे पुरवायची, बॉम्ब बनवायला मदत करायची असा पाकिस्तानचा डाव आहे. यासाठी अलीकडील काळात वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी पाकिस्तानकडून वापरल्या जात आहेत.

 
सुरुवातीला पाकिस्तानने जमिनीखाली बोगदे तयार करुन पंजाब, काश्मीर यांसारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु बीएसएफच्या जवानांनी हे बोगदे तपासण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थ आणि शस्रास्रे पाठवण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आता अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ड्रोन्सच्या माध्यमातून होणारा अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यामध्ये यश येत आहे. त्यानंतर आता महिलांचा कुरीयर म्हणून वापर करत पाकिस्तान अमली पदार्थ भारतात पाठवत आहे. तसेच समुद्री मार्गाने कांडलासारख्या बंदरांमधून कंटेनर्समधून टनांनी हेरॉईन पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात, हवाई, समुद्री आणि जमिनी अशा तिन्ही मार्गाने पाकिस्तान तरुणपिढीला बरबाद करणारे हे विष भारतात पेरत आहे.

 
मध्यंतरी असे आढळून आले होते की, काही पाकिस्तानी स्मग्लर श्रीलंकेच्या तुरुंगातून समुद्री मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीचे नियोजन करत होते. आपल्याकडे मुंबई विमानतळावर युगांडा, नायजेरिया आदी ठिकाणांहून येणार्‍या अनेक स्मग्लरना मागील काळात रंगेहाथ पकडण्यात आपल्या तपास यंत्रणांना यश आले आहे. तथापि, यातील दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्याकडील तरुणपिढी यामध्ये प्रचंड प्रमाणात गुरफटत चालली आहे. अगदी मोठमोठ्या, प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणारे अनेक तरुण हे या अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. अगदी आयआयटीसारख्या संशोधन क्षेत्रातील संस्था असोत किंवा व्यवस्थापनाची महाविद्यालये असोत, या परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा करणारे अड्डे तयार झाले आहेत.

 
गेल्या वर्षभरात २५ हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी लढायची नाहीये; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे. आज आपला मुलगा अमली पदार्थांचे सेवन करत आहे की नाही, हे पालकांना तोपर्यंत माहीत नसते जोपर्यंत तो पूर्णपणे व्यसनाधिन होत नाही. हे लक्षात घेता आपल्या पाल्यांबाबत अत्यंत जागरुक राहण्याची वेळ आजच्या काळात पालकांवर आली आहे. आजच्या पालकांची संगोपनाची व्याख्या पाहिल्यास बहुतांश आई-वडिलांचा कल मुलांना भरपूर पैसे आणि भौतिक सुविधा देण्याकडे असल्याचे दिसते. पण याखेरीज मुलांना पालकांनी क्वालिटी टाईम देणे गरजेचे आहे. तसेच ते काय करतात, ते कोणाबरोबर राहतात, त्यांची संगत कशी आहे, फ्रेंडसर्कल कसे आहे, त्यांच्या सवयींमध्ये काही बदल झाला आहे का, आपले मूल आपल्याशी काही लपवल्यासारखे वागते आहे का यावर पालकांचे अत्यंत सजगपणाने लक्ष असले पाहिजे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले अनेक तरुण आपल्या वडिलांच्या व्यवसायातून पैसे चोरतात, क्रेडिट कार्डचा वापर करुन कर्जबाजारी होतात; पण तरीही पालकांना याचा थांगपत्ता नसतो. काही पालक हे लक्षात आले तरी तरुण वय आहे, पैसा लागतोच असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक, हे चुकीचे आहे. मुलांचे डोळे कसे आहेत, त्याच्यात काही सिंड्रोम्स दिसताहेत का, तो बावचळल्यासारखा, भ्रमिष्टासारखा वागतोय का, त्याची एकाग्रता कमी झाली आहे का, झोप कमी अथवा जास्त झाली आहे का या रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण पालकांनी केले पाहिजे. कोणतेही व्यसन हे सुरुवातीला गंमत किंवा थ्रील म्हणून केले जाते. पण पाहता पाहता आपण त्याच्या मगरमिठीत कसे अडकत जातो हे समजत नाही. याबाबत पालकांना वेळोवेळी मुलांना सावध केले पाहिजे. अगदी हुशार म्हणवली जाणारी मुलेही काही दिवसांत व्यसनाधिनतेच्या वाटेवर जाताना पाहायला मिळाली आहेत आणि त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे. अशी उदाहरणे मुलांसमोर आणली पाहिजेत.
ड्रग्ज पुरवठा करणारे पेडलर खरेदीदार तरुणांना आणखी चार जणांना तू ड्रग्ज घ्यायला प्रोत्साहन दे, तसे केल्यास तुला आम्ही मोफत ड्रग्ज देऊ असे सांगतात. त्यातून हा संसर्ग वाढत जातो. दुसरीकडे, हे तरुण एजंट बनून जातात आणि यामागचा मुख्य सूत्रधार लांब निघून जातो. परिणामी, पोलिसांच्या किंवा तपास यंत्रणांच्या जाळ्यातही हीच नवखी तरुण मंडळी सापडतात. त्यातून यामागच्या मास्टरमाईंडचा शोध घेणे कठीण होऊन बसते.

 
हा सेल्फ जनरेटिंग, कमी श्रमाचा आणि प्रचंड पैसा असलेला व्यवहार आहे. त्यामुळे यांचे मूळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात असले तरी आपल्यातीलच काही लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे येताना दिसतात. त्यांना यातील धोका माहीत नसतो असे नाही; पण झटपट पैशांची चटक त्यांच्यावर हावी होते. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा, स्वतःचा विचार न करता ही मंडळी या व्यवसायात सहभागी होतात. हे वास्तव लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनीही केवळ आपल्या हिकमतीवर अमली पदार्थांचा विळखा मोडीत काढता येईल या भ्रमात न राहता प्रचंड मोठ्या संख्येने पोलिस मित्र तयार करण्याची गरज आहे. जनतेला जितक्या मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी केले जाईल तितक्या सुलभरित्या याबाबतची माहिती मिळवणे सोपे होईल आणि त्यातून हा विळखा तोडता येईल.

 


VIEW POST

View more
Articles

दहशतवादाविरुद्ध लढाई

By on October 9, 2023

दहशतवादाविरुद्ध लढाई

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलिस महासंचालक

 

  1. भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा विचार केला तर एकदोन दशकांपूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात काही फरक आहे का, तुम्ही तुलना कशी करालविशेषत: मुंबई, बंगळुरु, हैदराबाद सारख्या महानगरांमध्ये घडणाऱ्या  मोठ्या दहशतवादी कारवाया आता इतिहासजमा झाल्या आहेत किंवा थंडावल्या आहेत, अशी परिस्थिती आहे का?      

2014 मधे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर व त्यापूर्वी भारतामधील दहशतवादाची परिस्थिती यामधे जमिन असमानाचा फरक आहे. 2014 पूर्वी दिल्ली, जयपूर, मुंबई, नागपूर, पुणे बंगळुरू, हैद्राबाद, कोईमतूर अशा भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये अनेकवेळा दहशतवादी हल्ले झाले होते. 2014 नंतर काश्मिरमधे दहशतवादी हल्ले झाले आहेत. परंतु 2019 मधे कलम 370 अ रद्द केल्यानंतर हे हल्ले ठोसपणे कमी झाले आहेत. इतरत्र भारतामधे दहशतवाद्यांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला परंतु तत्पूर्वीच ह्या प्रयत्न करणारयांना पकडण्यात आले.  त्यामुळे त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे हे दहशतवादी प्रयत्न करताएत परंतु त्यापूर्वीच जागरूक असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्यावर परिणामकारक काारवाई केली आहे. 



  1. जागतिक स्तरापासून अगदी तळागाळातील, दहशतवादाचा सामना करण्याची जबाबदारी कोणकोणत्या सुरक्षा संस्थांवर सोपवलेली असते आणि त्या कशा प्रकारे एकमेकांशी समन्वय साधतात?

 

जागतिक स्तरावर इंटरपोल तसेच विविध मित्र राष्ट्रांमधे असलेला समन्वय व संयुक्त राष्ट्रे ही दहशतवादाविरुद्ध काम करत आहेत. भारतात NIA (national investigation agency) राज्यामध्ये ATSऽ स्थानिक पोलीस हे एकमेकांशी समन्वय ठेऊन दहशतवाद विरोधी कारवाया करत असतात. ह्याशिवाय NCB (narcotics control Bureau) ही आमली पदार्थांविरोधी कारवाई करते. महाराष्ट्रात CID मधे आमली पदार्थ विरुद्ध Task Force ची निर्मिती करण्यात आली आहे. आर्थिक दहशतवादाविरुद्ध ED (Enforcement Directorate) कारवाई करते. सायबर गुन्ह्यांविरुद्ध केंद्र व राज्य पातळीवर विशेष यंत्रणा उभारण्यात आली आहे. ह्या सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये भारत सरकारचे गृह मंत्रालय व त्यात काम करणार्‍या सुरक्षा यंत्रणा सतत जागरूक राहून सर्व संबंधितांना माहितीची देवाण-घेवाण व देशाबाहेरील यंत्रणांशी समन्वय राखत असतात.

 

  1. तंत्रज्ञान जसजसे प्रगत जातं तसतसे दहशतवादाचे स्वरूप देखील विकसित होतं.उदाहरणार्थ, क्रिप्टो चलन, हवाला जाळं, अंमली पदार्थांची तस्करी अशा गुन्हेगारीचे वाढते धोके! तर भारतातली पोलीस यंत्रणा आणि तिला उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, या धोक्यांचा, गुन्हेगारी मधल्या वाढत्या आधुनिकतेचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत का?

 

नवनवीन तंत्रज्ञान वापरून भारताबाहेरील दहशतवादी त्याचा गैरवापर करत आहेत. ह्यावर उपाय करण्यासाठी भारतातील पोलीस यंत्रणाही नवीन प्रशिक्षण व पायाभूत सुविधा ह्यांचा सक्षमतेने वापर करत आहेत. परंतु ही न संपणारी अशी प्रक्रिया आहे. दहशतवादामुळे बळी ठरलेल्या अनेक देशांनी जसे इस्रायल, फ्रांस, इंग्लंड, अमेरिका, भारत हे एकत्र येऊन दहशतवादाच्या नवीन गुन्हेगारीविरुद्ध एकत्रितपणे प्रतिकार करीत आहेत.

 

 

  1. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी कशाप्रकारे चाकोरी बाहेर विचार करावा आणि नवनवीन कल्पनांनी युक्त अशा उपाययोजना राबवाव्या ?


दहशतवादाचा सामना ही सर्व लोकशाहीप्रेमी राष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा, तसेच जबाबदार नागरीक ह्यांची संयुक्त जबाबदारी आहे. दहशतवादाविरोधी आधुनिक तंत्रज्ञान तसेच व्यक्तिकेंद्रित माहिती अचूकपणे मिळवणे आवश्यक आहे. Artificial Intelligence (AI) च्या मदतीने अचूक माहिती मिळविणे शक्य झाले आहे. तसेच मोबाईल वापरामुळे ह्या दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण नक्की करण्यात बरीच मदत होत आहे. परंतु तरीही दहशतवाद्यांधील व्यक्तिंकडून अचूक माहिती मिळविण्यासाठी पोलीस मित्रांची फार मोठी आवश्कता आहे. सुरक्षा यंत्रणा व सामान्य माणसे ह्यातील दूरी हे पोलीस मित्र कमी करतात व आजूबाजूला घडत असणार्‍या संशयास्पद कारवायांची माहिती ते सुरक्षायंत्रणांना त्वरित देतात.

  1. गेल्या काही वर्षांचा धांडोळा घेतला, तर गेल्या 9 वर्षांत दहशतवादाची परिसंस्था यशस्वीपणे नष्ट झाली आहे किंवा समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे तुम्हाला वाटते का?

 

दहशतवादामधे देशांतर्गत दहशतवादी कारवाई करणारे व देशाबाहेरील दहशतवादाला प्रोत्साहन देणारे असे दोन मुख्य गट आहेत. देशामधे दहशतवादी कारवाया होणार नाहीत ह्यासाठी आाज देश मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे. परंतु भारताची शत्रू राष्ट्रे भारतातील जनतेत धर्म, प्रांत, लिंग, भाषा, जात अशा विविध मार्गांनी असंतोष निर्माण करण्याचा व तुमच्यावर अन्याय होत आहे त्याचा तुम्ही प्रतिकार करावा ह्यासाठी प्रशिक्षण, शस्त्रे, दारुगोळा, अमली पदार्थ, दळणवळणाची साधने अशा अनेक प्रकारे मदत करत आहेत. ह्याशिवाय जनतेमधे बुद्धिभेद निर्माण करून भारतातील सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सतत संशयाचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यातच पेड न्यूज, फेक न्यूज, फेक व्हिडिओज पसरविण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आले आहे.



  1. डावी विचारसरणी किंवा साम्यवाद आधार मानून फोफावलेला कट्टरतावाद आणि बंडखोरीबद्दल बोलायचं झालं,तर  सध्या अशा कारवायांची व्याप्ती आणि प्रमाण किती आहेगेल्या दशकभरात अशा कारवायांमधून होणारी जीवित आणि वित्तहानी कमी करण्यात पोलीस आणि प्रशासन कितपत यशस्वी झाले आहेत? A

डाव्या विचारसरणीमुळे फोफावलेल्या बंडखोरीमधेही 50% हून अधिक घट झाली् आहे. विकासाची कामे, रोजगार निर्मती, रेल्वे रस्ते यांचे वाढलेले जाळे ह्यामुळे माओवाद्यांनी निर्माण केलेली सुरक्षित ठिकाणे जवळजवळ नाहिशी झाली आहेत. स्थानिक नवीन भरती जवळ जवळ संपलेली आहे. पोलीस आणि प्रशासन ह्यांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे स्थानिक व्यक्ती माओवाद्याच्या विरुद्ध माहिती देण्यास पुढे येत आहेत. तसेच अनेक मओवादीही सामान्य जीवन जगण्यासाठी शासनाने दिलेली मदत स्वीकारून बंडखोरी विरुद्ध पुढे येत आहेत.



  1. पुढील 2 वर्षात हा डाव्या विचारसरणीचा कट्टरतावाद पूर्णपणे समूळ नष्ट होईल असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहेहे ध्येय साध्य करता येईल का?

 

गृहमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे पुढील दोन वर्षात डाव्या विचारसरणीचा कट्टरवाद नष्ट करण्यासाठी सर्व संबंधित राज्य सरकारांनी भारत सरकारबरोबर एकदिलाने प्रयत्न केल्यास हे ध्येय साध्य करणे अवघड नाही.


  1. या डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी सरकारचं झिरो टॉलरन्स म्हणजेच हा प्रकार अजिबात खपवून घेण्याचं धोरण काय आहे?

Zero tolerance म्हणजे ज्या ठिकाणी कट्टरतावादी शस्त्रास्त्रे वापरत असतील तेथे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. गैर कायदेशर कृत्ये करणार्‍यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच जे शहरी नक्षलवादी आर्थिक, मनुष्यबळ, दळणवळणाची साधने, प्रशिक्षण अशा प्रकारे मदत करत असतील, त्यांनाही उघड पाडले जाईल. व त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
 

  1. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी आणि आणि या क्षेत्रासह नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं काय विशेष प्रयत्न केले आहेत?

 

नक्षलभागाच्या विकासासाठी गडचिरोली, गोंदिया भागामधे ‘‘पोलीस दादालोरा खिडकी’’ योजने अंतर्गत एक लाखाहून अधिक स्थानिकांना विविध आवश्यक शासकीय प्रमाण पत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच त्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण ह्याची व्यवस्था करण्यात आली आहे. International Association of Chiefs Of police ह्यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली ह्यांना सन्मानित केले आहे. तसेच विविध उद्योजक नवनवीन पोलादाचे कारखाने काढून येणार्‍या काळात एक लाखाहून अधिक व्यक्तीँना रोजगार निर्मिती करणार आहेत. 

   ————    ——————–    —————————–

                                                                               


VIEW POST

View more
Articles

कॅनडातील भारतीयांची सुरक्षितता

By on September 28, 2023

कॅनडातील भारतीयांची सुरक्षितता

कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत सक्षम

 

प्रवीण दीक्षित,

अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,

भुतपूर्व पोलीस महासंचालक.

खलिस्तानी दहशतवादी व संघटित गुह्नेगारी करणार्‍या हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. दरम्यान भारत सरकारने कॅनडामध्ये राहणारे विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांच्या सतर्कतेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये भारत सरकारने कॅनडात राहणाऱ्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू भारतीयांना धमकी देण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या कॅनडातील भारतीय लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आलेला दुरावा, त्याचा कॅनडात स्थायिक झालेल्या भारतीयांवर काय परिणाम होईल, याची चिंता आहे. मात्र असे असले तरी यामध्ये भारताच्या प्रयत्नांना अनेक देशांचा पाठिंबा आहे. त्यामुळे कॅनडावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. कॅनडातील भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत पूर्णतः सक्षम आहे.

भारताचे तुकडे व्हावेत व भारताचे कॅनडाशी संबंध बिघ़डावेत हा पाकिस्तानचा मनसुबा

        कॅनडा व भारत यांच्यातील संबंध बिघडावेत म्हणून पाकिस्तानच्या ISI नेच निज्जर याची हत्या केली अशी दाट शक्यता आहे. नुकत्याच उपलब्ध झालेल्या CCTV footage मधून स्पष्ट होते की ६ व्यक्तींनी गुरुद्वारा समोर ५० गोळ्या चालवून निज्जर ची हत्या केली आहे. हे लोक कोण होते त्यांनी वापरलेली कार कुठे आहे, ह्याचा तपास कॅनडाच्या पोलिसांना अद्याप लागलेला नाही. पाकिस्तान च्या सांगण्यावरून भारताचे तुकडे करण्याचा मनसुबा बाळगून असलेले खलिस्तानी आता कॅनडामधील भारतीय वंशातील नागरिकांना टार्गेट करू लागले आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, अशा आशयाचा व्हिडिओही व्हायरल झाला. भारतासाठी खलिस्तानी हे काही नवे नाहीत. त्यांच्या गुप्त कारवाया सतत चालू असतात. भारत-कॅनडाच्या वादात पाकिस्ताननेच भारताचे तुकडे व्हावेत यासाठी सुरु केलेली ही चळवळ आहे. स्वतःला खलिस्तानी म्हणवणारे अनेक लोक आहेत, आजही त्यांना पाकिस्तानमध्ये राजरोसपणे ठेवले राहू दिले जात आहे. त्यांना व्यवस्थित संरक्षण देण्यात येत आहे. त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे खलिस्तानी भारतामध्ये इतर देशांमधून ड्रग्स, अवैध शस्त्रास्त्रे यांचा धंदा करत आहेत. दहशतवादी कारवाया करत आहेत. यात प्रमुख देश म्हणजे पाकिस्तान, जर्मनी, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका हे आहेत.


दोन देशातील संबंध बिघडण्याला सर्वस्वी कॅनडा जबाबदार
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंध तणावाचे बनले आहेत. कॅनडानं या हत्येमागं भारताचा हात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. परंतू निज्जर दोन्ही हातात एके ४७ घेऊन उघड उघड गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.  म्हणजे तिथे अशी शस्त्रास्त्रे सहजपणे उपलब्ध होत आहेत. गुरपतवंत सिंग पन्नून याने कॅनडा मध्ये आवाहन केले आहे की सर्व हिंदूंनी कॅनडा सोडून जावे. हे जे चालू आहे ते म्हणजे तेथील शीख लोकांचा यांना पाठिंबा आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण तेथील फार कमी लोक त्यांच्या बाजूने उभे राहतील. गेल्या अनेक वर्षांपासून हे शीख लोक जे कॅनडात स्थायिक झाले आहेत, ज्यांनी शेती करून पैसे मिळवले आहेत त्यांची New Democratic Party आहे. त्याचे 28 खासदार आहेत. ते तेथील गुरुद्वारा मध्ये एकत्र झालेले पैसे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांना देतात. त्यांच्या पाठिंब्यावर टुड्रो पंतप्रधान म्हणून टिकून आहेत.  त्यामुळे हे लोक जे बोलतील त्याला टुड्रो पाठिंबा देत आहेत.  शिखांच्या बाबतीत पुष्टीकरण करण्याचे टुड्रो यांचे धोरण आहे. प्रत्यक्षात हे संघटित गुन्हेगारी करणार्‍यांना मदत करणारे आहे जे खुद्द कॅनडाला सुद्धा जड जाणार आहे. पाकिस्तानमध्ये या गोष्टी चोरीछुप्या चालू आहेत. मात्र कॅनडा मध्ये हे राजरोसपणे सुरु आहे. त्यांचा नुसताच ह्या अतिरेकी शिखांना पाठिंबा आहे असे नाही तर ते त्यांना प्रोत्साहन पण देत आहेत. या गुह्नेगारांच्या कारवायाची माहिती भारताने कॅनडाला अनेकवेळा दिली आहे आणि यावर कारवाई करा असेही सांगितले. पण त्यावर ते काहीच करत नाहीत. त्यामुळे संबंध बिघडले आहेत. या दोन देशातील संबंध बिघडण्याला सर्वस्वी कॅनडाच जबाबदार आहे.           

  कॅनडातील भारतीयांच्या रक्षणासाठी सतर्कता
        कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया, राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्हे, गुन्हेगारी, हिंसाचारामुळे सध्या कॅनडामध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी तसेच प्रवासाचा विचार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला केंद्राच्यावतीने देण्यात आला आहे. अलीकडे भारतविरोधी अजेंडा चालवणाऱ्या लोकांकडून भारतीय मुत्सद्दी आणि तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायाला धमक्या दिल्या जात आहेत. भारतीय नागरिकांना कॅनडातील ज्या भागात अशा घटना घडल्या आहेत अशा ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कॅनडामधील भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी भारताचे उच्चायुक्त/ वाणिज्य दूतावास कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. कॅनडातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना उच्चायुक्त/ वाणिज्य दूतावासांमधे नोंदणी करण्यास सांगितले आहे. वर्षानुवर्षे   कॅनडात राहणारे  हे सगळे लोक जरी हिंदू असले तरी ते कॅनडाचे नागरीक/ स्थायिक आहेत. त्यांना प्रत्यक्ष संरक्षण देणे हे शक्य नाही. मात्र संयुक्त राष्ट्र संघासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना व इतर मित्र राष्ट्रे त्यांच्या संरक्षणासाठी कॅनडावर दबाव आणतील.


सध्याच्या सरकारकडून सावरकरांच्या विचारांचे अनुकरण
वीर सावरकरांनी जे सांगितले ते आजही लागू पडत आहे. कारण कॅनडासोबत निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देताना वीर सावरकरांच्या विचारसरणीचा भारत सरकार अवलंब करत आहे. वीर सावरकरांचे विचार अतिशय वास्तववादी होते आणि आपले सरकारही त्याच मार्गाने जात आहेत. कारण कॅनडाला समजणारी भाषा अशीच आहे. त्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या सबळ असणे गरजेचे आहे.  भारताने आधुनिक तंत्र शस्त्र यांनी सुसज्ज असावे हीच वीर सावरकरांची मागणी होती. या लोकांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीला उत्तर देण्याची ताकद भारताकडे आहे. तरच तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होऊ शकत नाही. हे सावरकरांचे मूलभूत चिंतन आहे. त्यामुळे सावरकरांच्या विचारातील तथ्य आता भारत सरकार अंमलात आणत आहे.  

————————————————————-   ——————————————–


VIEW POST

View more
Articles

पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय

By on September 19, 2023

पोलिसांवरील ताण व त्यासाठी उपाय

प्रवीण दीक्षित

पोलीस महासंलक(निवृत्त)

देशात कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी, शांतता असावी व त्यातून जनसामान्यांना स्वतःचा व राष्ट्राचा विकास करता यावा ह्या उद्देशाने शासनाने पोलीसदलाची निर्मिती केली आहे. परंतु प्रत्येक समाजात अनेक कारणांमुळे गुन्हे करणारे, समाजामधे धर्म, जात, प्रांत, भाषा, लिंग अशा अनेक कारणांनी असंतोष निर्माण करणारे, दंगली घडवू आणणारे व त्यातून आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करणारे अनेकजण असतात. अशा ह्या समाजविघातक, राष्ट्रद्रोही व्यक्तींचा समाजातील सामान्य नागरिक फारसा विरोध करू शकत नाहीत. त्यांना संघटितपणे, कायद्याच्या आधारे, त्यांनी सभ्यपणाचा घातलेला बुरखा दूर करून न्यायालयापुढे सादर करणारे व त्यांना नयायालयामार्फत शिक्षा करणारे पोलीस दल आवश्याक आहे व ते पोलिसांचे  आद्य कर्तव्य आहे. परंतु पोलीसांच्या कामामधे ढवळाढवळ करणे, गुन्हेगारांना, समाजविरोधकांना पकडू न देणे, पकडले असल्यास त्यांना सोडायला लावणे, गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटा शोधून शिक्षा होऊ न देणे ह्यासाठी समाजाील अनेक घटक हे हिरिरीने प्रयत्न करताना दिसतात. पोलीसांचे मनोधर्य खच्ची करणे, त्यांनी केलेल्या कर्तव्याबद्दल त्यांना निलंबित करणे, त्यांना पदोन्नती मिळू न देणे ह्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. स्वतःची मनमानी चालू ठेवता यावी हयासाठी स्वतःच्या हातचे बाहुले होऊन वागणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यासाठी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणार्‍या अनेक व्यक्ती काम करत असतात. आपण केलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष व्हावे व आपल्याराजकीय विरोधकांना कायद्याच्या माध्यमातून त्रास देता यावा ह्यासाठी ह्या पोलीस अधिकार्‍यांचा वापर केला जातो. आपल्या मनाविरुद्ध व कायद्याप्रमाणे वागणार्‍या अधिकार्‍यांना वेळोवेळी बदलून त्यांना अकार्यकारी व कमी महत्त्वाच्या पदांवर तडकाफडकी बदलले जाते. पोलीसांचा पाणउतारा करण्यासाठी बदली व निलंबन ही दोन शस्त्रे प्रामुख्याने पाजळली जातात.

ह्याशिवाय समाजातील गुन्हेगार व्यक्ती वाहतुकीचे नियम पाळायला सांगणार्‍या पोलिसांवर हल्ले करतात. गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलीस चमूवर जीवघेणा हल्ला करून त्यांना पळवून लावले जाते वा ठार मारले जाते. अनेक गुन्हेगारांनी बेकायदेशीररीत्या जमवलेल्या पैशातून अनेक सिनेमे काढले आहेत; ज्यात पोलीसांचा पांडु हवालदाार, नेभळट, लाचखोर, लाचार अशाप्रकारे वर्णन केले जाते. ह्या सर्व गोष्टींमुळे पोलीसांचे मानसिक खच्चीकरण व्हावे हा उद्देश असतो. 

पोलीसांना आवश्यक अशी सर्वसोयींनी युक्त सरकारी घरे निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन न देणे, असलेल्या घरांची डागडुजी न करणे ह्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे सारख्या महानगरातील पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत खराब स्थितीत जगावे लागते. रोज 12 तास काम, सुट्टी मिळण्याची कमी शक्यता ह्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात येते व ते व्यसनाधीन बनतात. वेळच्यावेळी जेवण न मिळणे, शांत झोप न मिळणे, व्यायाम करायला सोयी नसणे ह्याचा परिणाम होऊन पोलिसांना सतत ताणतणावात दिवस काढायला लागतात.   

ह्यावरील उपाय म्हणून पोलीसांच्या कामाच्या वेळा कमी करणे, जिथे काम असेल त्या ठिकाणीच त्यांची राहण्याची, व्यायामाची, झोपायची सोय करणे, त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित ठिकाणी आवश्यक त्या सोयींनीयुक्त घरे बांधणे गरजेचे आहे. त्याशिवाय पोलीसांची टिंगल टवाळी करणार्‍या सिनेमांवर समाजाने जाहीर बहिष्कार घालणे, पोलीसांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी प्रत्येक सक्षम स्त्री-पुरुष यांनी पुढे येऊन पोलीस-मित्र म्हणून काम करणे जरुरीचे आहे. येणार्‍या गणपती, मोहरम, नवरात्र उत्सव ह्यासाठी पोलिसांनीही पोलीस मित्रांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. लोकांनीही त्यात समजूतदारपणा दाखवणे जरूरीचे आाहे. राजकीय नेतृत्त्वानेही पोलीसांच्या कायदेशीर कामामध्ये ढवळाढवळ न करणे, पोलीसांची बदली अथवा निलंबन दबावाखाली न करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पोलीसांनाच मदत होईल असे नव्हे तर समाजाला व राष्ट्रालाही जगात विकसित देश बनविणे शक्य होईल.

———————————————


VIEW POST

View more
Articles

फौजदारपदी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 

By on August 26, 2023
फौजदारपदी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 
प्रवीण दीक्षित
निवृत्त पोलीस महासंचालक 
१ फौजदार ह्नया प्रतिष्ठित व कठीण परीक्षेत यशस्वी   झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन
२ त्यांना सहाय्य करणाऱ्या विविध शिक्षक , प्रशासकीय कर्मचारी  तसेच त्त्यांयांचे कुटुंबीय ह्यांचे अभिनंदन!
३ निवड झालेल्या उमेदवारांनी  वैयक्तिक चारित्र्य निष्कलंक राखणे महत्वाचे आहे
४ मैत्रीण मित्र असणार्यांना लग्नाचे आश्वासन देऊन फसवणुक करू नका. विवाहपूर्व शरीर संबंध ठेवणे कटाक्षाने टाळा . असतील तर त्याच व्यक्तींशी विवाह करा अन्यथा त्यामुळे नोकरी जाऊ शकते.
५ भ्रष्टाचार करण्याचा मोह प्रयत्नपूर्वक टाळा. तुम्हाला फसवण्यासाठी अनेक सापळे मुद्दाम केले जातील .स्वतःवर संयम ठेवा.
६ तुम्ही करत असलेल्या प्रत्येक तपासाचे digital record ठेवा जमेल तेव्हा ते लिहून काढा . आवश्यक असल्यास वरिष्ठांना पाठवा.
७ अकादमीत प्रत्येक विषय समजून घ्या जरूर तर प्रश्न विचारा . तुमच्या शब्दात समजलेला विषय लिहून काढा
८ नवीन तंत्रज्ञान नवीन विषय आत्मसात करा जसे Forensic medicine, artificial intelligence, cyber crimes, economic offences, यांच्यात पारंगत व्हा
९ नेमणुकीच्या ठिकाणी हद्दीतील कार्यालये प्रसिद्ध लोक ह्यांना वारंवार भेटा तुमच्या कार्याची त्यांना माहिती द्या .
१० दैनंदिन गोष्टींबाबत जागरूक रहा . जमेल तेव्हा प्रसार भारती आकाशवाणी च्या माध्यमातून बातम्या पहा/   ऐका
११ अनेक विषय online उपलब्ध आहेत ते मुद्दाम शिकायचा प्रयत्न करा
१२ जमल्यास IB,  CBI , NIA सारख्या संस्थांमधे प्रति नियुक्तीवर जा .
१३ मुंबई सकट कुठेही नेमणुकीस तयार रहा . रहायची अडचण वाटली तरी ती सहन करा . मुंबईत राहण्याने   तुम्हाला काम शिकायला मदत होईल
१४ तुम्हाला कोणी भ्ष्टाचार करायला लावल्यास त्याची सविस्तर नोंद ठेवा योग्य वेळ येताच   त्याचा उपयोग करा.
१५ तुमच्या प्रत्येक कामास तुम्ही जबाबदार आहात व न्यायालयात त्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण देयावे लागेल यांचे भान ठेवा
१६ कोठडीतील छळवणूक करू नका. तुम्ही गोत्यात येऊ शकता.
१७ तुम्ही गणवेशात असा किंवा नसा तुमच्यावर केव्हाही जीवघेणा हल्ला होऊ शकतो . त्या साठी सतत तयारीनिशी सुसज्ज रहा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक बळीचा वापर करणे ही तुमची जबाबदारी आहे . त्यात कचरू नका.
१८ जे काम तुम्हालाच करायचे आहे ते तातडीने पूर्ण करा. त्या नंतर routine कामे करा अन्यथा वेळ कधीच पूरणार नाही .
१९ प्रामाणिकपणे काम करा
२० आई वडिलांना विसरू नका.
२१ तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या बरोबर राहून साथ देईल अशा व्यक्तीशी विवाह करा.
तुमचे यश म्हणजे राष्ट्राचे यश हे लक्षात ठेवा . 


VIEW POST

View more
Articles

Birthday Greetings!

By on July 28, 2023

Greetings from Hon PM Narendrabhai Modi on the occasion of my birthday

 

प्रविण दीक्षित सर

पोलिस विभागात जे काही अतिदक्ष अधिकारी मी बघितले त्यात प्रविण दीक्षित सर यांना बराच अग्रक्रम द्यावा लागेल. सहसा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असा दैनंदिन कामाचा दिनक्रम असतो. पोलीस विभागात मात्र वेळेची मर्यादा नसते हे जरी खरे असले तरी सकाळपासून रात्री दहापर्यंत काम चालते. पण दीक्षित सर मात्र रात्रीही अगदी दक्ष असायचे. वायरलेस वर रात्रीही सावध राहून लक्ष ठेऊन असायचे. कधीही वायरलेस वर सतर्क राहून लगेच आदेश व सूचना द्यायचे.
आपण फोन केला आणि सरांचा फोन व्यस्त असला तर सर स्वतः परत फोन लावायचे आणि
‘ काय होते ‘
असे विचारुन माहिती घ्यायचे.

इतक्या मोठ्या पदावर असूनही एकदम साधी राहणी. ना पदाचा गर्व ना अभिमान. त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी फक्त एक दिवस सुट्टी घेऊन लगेच परत आले.
‘ शासनाने आपल्याकडे जबाबदारी दिली आहे तर ती योग्यप्रकारे पार पाडायला हवी ‘
असे ते म्हणायचे.

नागपुर येथे पोलीस आयुक्त असताना प्रविण दीक्षित सर यांनी केलेल्या कामाची आजही नेहमी आठवण निघत असते. नागपूर शहरात वाहतुकीला शिस्त लावायची महत्वाची कामगिरी सरांच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली होती. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरुद्ध च्या केसेस ही सरांच्या काळात मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा नागपूर शहर पोलीस दलात वापर ही त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाला होता.
एक अत्यंत शिस्तप्रिय व अभ्यासू अधिकारी अशी प्रविण दीक्षित सर यांची ख्याती आहे.
आपल्या सोबतच्या पोलीस अधिकारी यांचेकडून अजानता काही चूक झाली तर खंबीरपणे त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे व प्रसंगी ‘ वाटल्यास माझी बदली करा ‘ असा गंभीर पवित्रा ते घ्यायचे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असताना प्रविण दीक्षित सर यांनी विनंतीवरून पोलीस अधिकाऱ्यांच्या दर दोन महिन्यांनी बदल्या करून न्याय दिला होता. आत्ता अडचण आहे तर वर्षाने बदली करून काय उपयोग असा पवित्रा सरांनी घेतला होता.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक या महत्वाच्या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आरामात जगायचे असा सरांनी विचार केला नाही. विविध सामाजिक कार्यात स्वतः ला गुंतवून ठेवले आहे. त्यांचे पोलीस विषयावरील वैचारिक लेख नेहमी प्रसिद्ध होत असतात. आजही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन पोलीस विभागाला मिळत असते.

कर्तव्यदक्ष, अभ्यासू, शिस्तप्रिय प्रविण दीक्षित सर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे खरोखर माझे भाग्य म्हणावे लागेल.

तर अश्या प्रविण दीक्षित सर यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व उदंड, निरामय आयुष्य लाभून मनोवांछित इच्छा सफल होवोत हीच विधात्याचरणी प्रार्थना.

संजय भिकाजी पांडे
पोलीस उपअधीक्षक ( नि.)
नागपूर

 

आज मित्रवर्य निवृत्त पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांचा वाढदिवस ..
त्याच्या कारकीर्दीत पोलीस खात्यात एक नवी ऊर्जा निर्माण करण्याचे … नक्षलवादी चळवळ ठेचून काढण्याचे .. अॅन्टी करप्शन मधून राजकीय कृपा छत्र लाभलेले बाहुबळी पुढारी ना स्थानबध्द करण्याचे.. गुन्हेगारास शिक्षा होण्याच्या टक्केवारी त लक्षणीय वाढ करण्याचे .. “प्रतिसाद” (ASK ) सारखे महिला सुरक्षा अप ची अंमलबजावणी करण्याचे .. जनतेला पोलीस मित्र बनवून त्याचे सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी केलेले कार्य खूपच प्रभावी व प्रशंसनीय आहे ..

महाराष्ट्र शासनाने त्यांची MAT चे सदस्य पदी नियुक्त केले .. तिथेही कामाची छाप पाडली 🙏🏼

पुणे सार्वजनिक सभा स्थापना 1870 कडून त्यांना सार्वजनिक काका पुरस्कार प्रदान करण्यात आला.. 🙏🏼

त्यांचे यशाच्या पाठी त्यांच्या सुविद्य पत्नी संस्कृत पंडिता व शैलीदार लेखिका अरुंधती वहिनी चा सुद्धा मोठा हातभार आहे त्यांचे सुद्धा मनःपूर्वक आभार

माझ्या फेसबुक व्हाटस अप
आणि आमच्या फर्ग्युसन च्या सर्व मित्रपरिवारा तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा ..
……………………….. ………………………………..
सुरेश सोपानराव कालेकर
….. …….

 

 

 

 

 


VIEW POST

View more
Articles

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणुक

By on July 27, 2023

दामदुप्पटच्या नावाखाली फसवणुक –

प्रवीण दीक्षित.

निवृत्त पोलीस महासंचालक.

आर्थिक गुन्ह्यांमधे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे हे सर्वात जास्त प्रमाणात होतात. ह्या गुन्ह्यांची सर्वसाधारण पद्धत अशी असते की एखादी अपरिचित व्यक्ती महत्त्वाच्या ठिकाणी जागा भाड्याने घेते व जाहिरात करते की तुम्ही जेवढी रक्कम त्याच्या योजनेत गुंतवाल तेवढ्या रकमेवर बँकेतील ठेवलेल्या मुदतीच्या ठेव्यांच्या दरापेक्षा जवळ जवळ दुप्पट दर असेल. त्याशिवाय तुम्हाला घरगुती वापराची महागडी उपकरणे नगण्य किमतीत घरपोच मिळतील. सुरवातीला दोनतीन महिने ही व्यक्ती सांगितल्याप्रमाणे व्याज देते व तुमचा विश्वास संपादन केल्यावर तुमच्यामार्फत अन्य व्यक्तींनाही पैसे गुंतवणुक करण्याचे आवाहन करते. जेवढ्या अधिक व्यक्तींकडून तुम्ही रक्कम आणाल त्यातील काही टक्के तुम्हाला बक्षीस म्हणून दिले जातात. काही व्यक्तींना मिक्सर, मायक्रोवेव्ह, घरगुती वापराचे डबे इत्यादि साहित्यही दिले जाते. आठ ते नऊ महिन्यानंतर दर महिन्याला मिळणारे व्याज मिळेनासे होते. तक्रार केल्यास ठेवी स्वीकारणारी व्यक्ती भेटायला टाळाटाळ करते. फोन स्वीकारत नाही.


वर्षभरात ही व्यक्ती एकदिवस अचानक नाहिशी होते व भाड्याने घेतलेली जागा रिकामी झालेली असते. आर्थिक फसवणुक करणारी व्यक्ती तो पर्यंत परदेशात गेलेली असते व जातांना अनेकांनी ठेवलेल्या मोठमोठ्या रकमा गायब झालेल्या असतात. त्यानंतर आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात आले की असे लोक पोलीसांकडे तक्रार करतात. तो पर्यंत मधे बराच काळ गेलेला असतो. पोलीसांच्या प्रयत्नांनी फसवणूक करणारी व्यक्ती देशात अथवा देशाबाहेर पकडली गेलीच तरीही लोकांनी ठेवलेल्या रकमा परत मिळणे दुरापास्त होऊन बसते. ही होणारी फसवणूक ponzi schems नावाने प्रसिद्ध आहे.

 

हे फसवणुकीचे प्रकार जास्त करून निवृत्त झालेल्या व्यक्तींचा मोठ्याप्रमाणावर बळी घेतात. कमी वेळात रक्कम दुप्पट होईल, मित्राने, ओळखीच्या माणसाने पैसे ठेवायला सांगितले त्यामुळे विशेष विचारपूस न करता अशा व्यक्ती आयुष्यभराची ठेव त्या माणसाच्या जवळ बिनधास्तपणे देत असतात. जेवढे आर्थिक मागासपण जास्त तेवढे तेथील व्यक्तींना फसवण्यात ह्या अपराधी व्यक्ती तरबेज असतात.

 

अशा प्रकारे एकाचवेळी अनेक जिल्ह्यात, अनेक राज्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वारंवार उघडकीस येत असल्याने प्रत्येक पोलीस आयुक्तालयात आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक पोलीस उपायुक्त नेमलेला आहे. फार मोठ्या रकमेची अफरातफर असेल तर त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याकडे आर्थिक गुन्ह्याच्या तपासाचे काम दिले आहे. अपराधी व्यक्ती पकडल्यानंतर त्याच्याकडील रकमेतून त्याने काही स्थावर मालमत्ता केली असल्यास ती जप्त करून येणार्‍या पैशातून पीडित व्यक्तींना ही रक्कम परत देण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या व्यक्तीची नेमणुक केलेली आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमधे न्यालयाकडून शिक्षा होण्यापेक्षा पीडित व्यक्तीस गेलेली रक्कम परत मिळणे जास्त महत्त्वाचे असते.

 

शासनातर्फे जरी वरी व्यवस्था राबवलेली असली तरीही कष्टाने मिळवलेले पैसे अशाप्रकारे दामदुप्पट करण्याच्या मिषाने किंवा अन्य कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता त्यापासून दूर राहणे हे शहाणपणाचे आहे. भारत सरकारतर्फे व रिझर्व बँकेनेही अशा अपराधी व्यक्तींविरुद्ध कडक तरतुदी केल्या आहेत. परंतु तरीही अशा प्रकारे फसवणारे व त्यांच्या भूलथापांना बळी पडणारे लोक ठिकठिकाणी वारंवार नजरेस येत असतात. आर्थिक सुशिक्षितता, सावधानता बाळगून, शासनमान्य शेड्यल्ड बँका, शेअरमार्केट, म्युचुअल फंड ह्याठिकाणी रक्कम गुंतवणेच योग्य आहे. अथवा पैसे गेल्याचे दुःख करण्यापलीकडे हातात काही उरत नाही.

————————————-


VIEW POST

View more
Articles

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ

By on July 22, 2023

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ
राष्ट्रीय रौप्य महोत्सवी परिषद
12-13/11/2022 वडोदरा

प्रवीण दीक्षित
माजी पोलीस माहासंचालक, महाराष्ट्र

अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ मुंबई व वडोदरा
यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही राष्ट्रीय रौप्य महोत्सवी परिषद सम्पन्न होत
आहे; त्यासाठी सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन. आजच्या ह्या परिषदेत माझी
सुविद्य पत्नी व मी आम्हाला ह्या परिषदेत उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध
करून दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो व उत्कृष्ट नियोजनाबद्दल
सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो.

स्वातंत्र्यपूर्वकाळामधे आपल्या समाजातील अनेक नामवंत व्यक्तींनी
राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमधे बहुमोल कामगिरी करून,
केवळ आपल्या जातीबांधवांनाच नव्हे तर जातीची बंधने ओलांडून देशातील सर्व
समाजाला फार मोठे मार्गदर्शन केले होते. दुर्देवाने गांधीहत्येनंतर विनाकारण
ब्राह्मण समाजातील शेकडो कुटुंबांना आपल्या घराची व सम्पत्तीची राखरांगोळी
होतांना पहावे लागले; त्यामुळे प्रसिद्ध कादंबरीकार व आनंदीगोपाळचे लेखक श्री.
ज. जोशी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व ब्राह्मण समाज हा स्वयंकेंद्री झाला व
त्याने अन्य समाजातील लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे सोडून दिले. ह्याचा
परिणाम म्हणून समाजातील हजारो तरूण तरूणी देश सोडून इतर राष्ट्रांमधे गेले
व तिथे त्यांनी स्वतःचे अत्युच्च यशाचे शिखर पादाक्रांत केले. ब्राह्मणांवरील
शारीरिक हल्ले जरी आता फारसे होत नसले तरीही त्यांना नावे ठेवायचे,

शाब्दिक टोमणे मारायचे आणि विनाकारण त्यांची निंदानालस्ती करायची हा
स्वतःला नेते म्हणविणार्‍या अनेक व्यक्तींचा गेली अनेक दशके लाडका उद्योग
आहे. अन्य वर्णीयांना सतत ब्राह्मणांविरुद्ध खरे खोटे सांगत राहून ब्राह्मणांनी
आमच्यावर अत्याचार केले अशी आवई कोणत्याही पुराव्यांशिवाय उठवत राहणे
ह्याच्यामधेच त्यांना आनंद मिळत असतो. दुर्दैवाने ह्यामागे भारत तोडो हा
परकीय शक्तींचा कुटिल डाव आहे व त्याला काही लोक बळी पडत आहेत.
परंतु ह्या सतत होणार्‍या उपेक्षेने किंवा ब्राह्मणांना होणार्‍या सर्व
प्रकारच्या विरोधाला किंवा पारंपारिक व्यवसायाला खीळ बसल्याने प्रचंड गरीबीला
न घाबरता ब्राह्मण समाजाने आपली मूल्यांवरील श्रद्धा ही सतत मनःपूर्वक
जपली आहे. मिळेल त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे, त्यातही आपली भाषा,
संस्कृती, परंपरा आणि विचार जपणे आणि वाढवत राहणे, कोणतेही काम हे
हलके किंवा निषिद्ध न समजता प्रामाणिकपणे कौशल्याने, सचोटीने करत राहणे
ही ती मूल्ये आहेत. त्यात महिला असोत वा पुरूष; मुले असोत वा वृद्ध,
स्वतःचा स्वाभिमान राखून, एकमेकांना मदत करून परंतु कोणाकडेही तोंड न
वेंगाडता कुठल्याही प्रकारे गुन्हेगारीच्या मार्गाला न जाता, फसवाफसवी न करता
ब्राह्मण समाज वाटचाल करत आला आहे व ती अव्याहत चालू आहे. कोणत्याही
प्रकारे आरक्षणाचा फायदा न घेताही किंवा शिष्यवृत्या न मिळताही
ब्राह्मणसमाजातील अनेक मुले, मुली यांनी मोठमोठ्या पदव्या मिळवल्या आहेत
व ज्ञानसमृद्धी केली आहे. आजही ब्राह्मण समाजातील काही व्यक्ती अत्युच्च
पदी पोचलेल्या असल्या तरी आपले हजारो जातीबांधव हे निम्न मध्यमवर्गीय
ह्या स्तरात मोडतात व त्यांच्यासाठी यशाच्या संधी अजून उपलब्ध व्हायच्या
आहेत. ही मुले मुली आम्हाला मदत करा असे म्हणणार नाहीत तरीही जे
आपल्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत त्यांनी आपल्या यशाची गुरुकिल्ली
ह्या मुलांसाठी उघड करणे आवश्यक आहे. भारत सरकार तसेच महाराष्ट्र
सरकार ह्यातल्या अनेक विभागांमधे दरवर्षी हजारो व्यक्तींची स्पर्धा परीक्षा
घेऊन भरती केली जाते. ह्या संबंधीची माहिती आज आंतर्जालाच्या मार्फत
सर्वांना आपल्या टिचकीवर उपलब्ध आहे. केवळ भारत सरकारचाच विचार केला

तर, सीमासुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल हया सारख्या सहा केंद्रीय
सशस्त्र पोलिस दलांनी मागील पाच वर्षात दोन लाख लोकांना रोजगार दिला
आहे. ह्या शिवाय येणार्‍या 18 महिन्यात 10 लाख युवकांना रोजगार देण्याचा
मोदी शासनाने निश्चय केला आहे. महाराष्ट्रातही 75 हजार युवकांना लवकरच
रोजगार देणार असल्याचे महाराष्ट्राचे नेते व ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस
ह्यांनी जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही रोजगार व शिक्षण ह्यात
आर्थिक मागास व अन्य कोठलेही आरक्षण नसलेल्या अशा गरिबांसाठी 10%
आरक्षण घटनेस अनुसरून आहे असा ऐतिहासिक निकाल दिला आहे. त्याचा
फायदा घेण्यासाठी युवकांनी पुढे यावे. महाराष्ट्र सरकारने अमृत अर्थात महाराष्ट्र
संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था हयाला मान्यता दिली आहे. परंतु
अद्याप त्याची कार्यवाही सुरू झाली नाही. ती तातडीने राबविण्याची आवश्यकता
आहे. ह्या संस्थेमार्फत ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील 96 जातींच्या
आार्थिक आणि शैक्षणिक प्रगीसाठी अमृतची स्थापना करण्यात आली आहे. असे
परशुराम सेवा संघचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ देशपांडे ह्यांनी सांगितले आहे.

सनदी सेवांसाठी तरूण विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनाची `स्वातंत्र्यवीर
सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर’ येथे सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाते.
आवश्यक त्या विषयांच्या टिप्पणी, प्राथमिक परीक्षा, लेखी परीक्षा, मौखिक
परीक्षा ह्यांची तज्ज्ञांकडू तयारी करून घेतली जाते. महेश कुलकर्णी हे वरील
काम निष्ठेने करीत आहेत. अशाच प्रकारच्या संस्था अन्य अनेक शहरांमधेही
निःशुल्कपणे वर्षानुवर्षे करीत आहेत, व्यवसायातही आज अनेक संधी उपलब्ध
आहेत. त्याचा आपण फायदा घेला पाहिजे.

माझ्या वडिलांची मी शाळेत असतांनाच डोळ्यांनी दिसत नाही ह्या
कारणासाठी नोकरी गेली. पण तरीही शाळेचे शिक्षण मी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण
झालो. महाविद्यालयात व विश्वविद्यालयात गुणांमुळे नादारी मिळाली व पुणे
विद्यापीठ येथून पदवी, School Of International Studies JNU येथून
पदव्युत्तर अभ्यासक्रम मी पूर्ण केला. भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर

रोटरी क्लबतर्फे अमेरिकेतील Duke विद्यापीठातील School of Public Policy
येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली.

तुम्ही जर प्रामाणिकपणे मन लावून अभ्यास केला असेल तर अनेक
संधी तुम्हाला शोधत येतात व त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता हे अधोरेखित
करण्यासाठी मी हे उदाहरण सांगत आहे.तरूणांनी मिळणार्‍या प्रत्येक संधीचा
आह्वान समजून स्वीकार करावा. येणार्‍या अडचणींवर मात करावी व
आायुष्यात यशस्वी व्हावे ही माझी व सर्व ब्राह्मण समाजाची कळकळीची इच्छा
आाहे. सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो.

—————— ——————– ——————-
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्यावी-
Day 1 proceedings on Nov 12 ,202
https://youtu.be/5LVQ5aLHRUs
Day 2 proceedings on Nov 13, 2022
https://youtu.be/DjQSSqDgmK0


VIEW POST

View more
Articles

परिपक्व राजकारणी

By on July 19, 2023

परिपक्व राजकारणी

प्रवीण दीक्षित

(निवृत्त पोलीस महासंचालक)

एकेकाळी महाराष्ट्रट, प्रशासनाच्या बाबतीत प्रगत राज्य म्हणून ओळखले जात असे. परंतु 2014 पूर्वीच्या दशकात महाराष्ट्रात आघाडीचे शासन सुरू झाले. हया काळात मुख्यमंत्री एका पक्षाचे तर गृहमंत्री दुसर्‍या पक्षाचे; त्यामुळे होणार्‍या निर्णायकी परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत नाजुक बनली. जगातील सर्वात भीषण असा दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला. समुद्रमार्गे दहशतवादी मुंबईत घुसले व त्यांनी तीन दिवस भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा सर्व व्यवहार ठप्प केला. शेकडो निरपराध व्यक्तींचे बळी घेतले. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना ह्या हल्ल्यात हुतात्मा व्हावे लागले. ह्या हल्ल्यानंतर असेच अनेक दहशतवादी हल्ले, शस्रास्त्रांची खुलेपणाने वाहतुक, मादक पदार्थांचा मोठा व्यापार, गुन्हेगारांचे पोलिसांवरील वर्चस्व, कोणत्याही गुन्हेगारांना शिक्षा न होणे हे प्रकार सर्रास सुरू झाले. केंद्राप्रमाणेच राज्यातील भ्रष्टाचार एवढाा वाढला की त्यामधे शासनाचा एकही विभाग, एकही जिल्हा मोकळा राहिला नाही. त्यामुळे सामान्य माणूस जिकीरीला येऊन महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का? अ‍से वैतागाने विचारू लागला.

ह्या पार्श्वभूमीवर 2014 मधे राज्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देवेद्र फडणवीस ह्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. मुख्यमंत्री होताच फडणवीस ह्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री ही दोन्ही पदे स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. गृहमंत्री म्हणून त्यांनी जाहीर केले, की पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या व नेमणूका ह्याचे पूर्ण अधिकार महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख असणार्‍या पोलीस महासंचालाकांना देत आहे.  त्यामुळे विविध राजकारण्यांची मदत घेऊन भ्रष्ट पोलीस अधिकारी हव्या त्या ठिकाणी नेमणूक करून घेण्याला खीळ बसली. पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांचे मनोबल वाढण्याला मदत झाली. पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या भरतीत पारदर्शीपणा आणून भ्रष्ट आधिकार्‍यांना व कर्मचारय़ांना पोलीसात पोचायचे दरवाजे बंद झाले.

दहशतवादामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमधे अपप्रकार रोखण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक CCTV यंत्रणा लावण्याचे अधिकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच ह्या सर्व महानगरातील सुरक्षा व्यवस्था बळकट होण्यास मदत झाली. तसेच पोलीसांच्या संरक्षणासाठी बुलेटप्रुफ जॅकेट्स घेण्याचा निर्णय करण्यात आला. ह्यामुळे पोलीस अधिकार्‍यांमधे सुसज्जता आली.

नक्षलवाद्यांच्या कारवाया महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गडचिरोली, गोंदिया ह्या भागात थैमान घालत होत्या. ह्या जिल्ह्यातील भ्रष्टाचारी राजकारणी, लोकोपयोगी कल्याणकारी योजना वंचित, शोषित, पीडित अशा वनवासी जनतेपर्यंत पोचू देत नव्हते. त्यामुळे नक्षलवाद्यांचा जोर वाढत होता. रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण संबधी सर्व योजना ठप्प झाल्या होत्या. पोलिसांकडे प्रभावी शस्त्रांचा अभाव, बॉंम्ब्स पासून संरक्षण देणार्‍या वाहनांचा अभाव, पोलीस अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या कामात अडथळा आणणार्‍या बाबी दूर करण्यासाठी प्रशासनाचे पूर्णपणे असंवेदनशील धोरण त्यामुळे महाराष्ट्रातून कधी नक्षलवाद संपेल का? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात भर म्हणून शहरी नक्षलवादी, सुशिक्षित अशा प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून ह्या असंतोषात वाढ करीत होते. फडणवीस ह्यांनी गृहमंत्री झाल्यावर पोलीसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीसांना पुरेशी प्रभावी शस्त्रास्त्रे, अन्य सामुग्री व धाडसी प्रशासकीय निर्णय घेतले. त्यामुळे गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 70 ते 75 पोलिस कर्मचारी शहीद होण्याऐवजी 40 नक्षलवादी पोलीसांच्या कारवाईत ठार झाले. अनेक प्रमुख नक्षल नेते धारातीर्थी पडले. इतर अनेक शरण आले. त्याच बरोबर सामान्य जनतेची उपेक्षा संपून तरुणांना रोजगार, व्यावसायिक प्रशिक्षण, आरोग्य सुविधा, शालेय मुलींना सायकली अशी अनेक कामे होऊ लागली; त्यामुळे नक्षल कारवायांना प्रतिबंध होऊन विकासाची कामे होऊ लागली. माओवादाच्या नावाखाली नक्षल व्यक्ती आंबेडकरवादी चळवळीचा गैरवापर करत होते. हा त्यांचा कपटी डाव उलथून पाडण्यात आला.

धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू होते. “भारत तोडो’’ ह्या मोहिमेचाच तो भाग होता. परंतु समाजातील सर्व घटकांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशील राहून पंतप्रधान मोदी ह्यांचा “सबका साथ सबका विकास’’ ही घोषणा फडणवीस ह्यांनी प्रत्यक्षात आणली. “पोलीस मित्र’’ ही संकल्पना रुजवून महाराष्ट्रातील सामान्य जनतेला समाजघातक कारवायांविरोधी प्रयत्नांमधे हातभार लावायला फडणवीस ह्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे महिलांविरुद्ध होणारे गुन्हे, अनुसूचित जाती जमातींवर होणारे अत्याचार ह्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.

विकासासाठी शहरांची होणारी वाढ लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन पोलीस आयुक्तालये सुरू करावीत अशी मागणी बरीच वर्षे  होत होती. ह्याचे गांभीर्य ओळखून मिराभाईंदर तसेच पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणी नवीन पोलीस आयुक्तालये सुरू करण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक ह्यांच्या नेतत्त्वाखाली समाजविरोधी गटांवर कारवाई होऊ लागल्याने त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली.

पूर्वी पोलीस अधिकार्‍यांची वार्षिक गुन्हेविरोधी परिषद ही गृहमंत्र्यांच्या उपस्थितीशिवाय पार पडत असे. परंतु केंद्रात पोलीस महासंचालक ह्यांच्या वार्षिक परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची प्रथा अमलात आली होती. ह्याचे अनुकरण करून महाराष्ट्रातही पोलीस अधिकार्‍यांच्या परिषदेस फडणवीस ह्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे मान्य केले. त्यामुळे ही परिषद म्हणजे औपचारिकता न राहता त्यात दहशतवाद विरोध, नक्षलवाद विरोध, सायबर व आर्थिक सुरक्षा, महिला सुरक्षा अशा अनेक बाबींवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचा परिणाम होऊन जनसामान्यांचा शासनावरील विश्वास दृढ झाला.

गुन्हेगारांना न्यायालयाकडून शिक्षा होणे हाच गुन्हेगारीस प्रतिबंध करण्याचा प्रभावी उपाय आहे हे लक्षात घेऊन गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी पोलीस तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानानाचा वापर करणा्यावर फडणवीस हयांनी भर दिला. CCTNS प्रणााली यशस्वीपणे राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले. न्यायवैद्यक संस्था मजबूत करण्यात आल्या. तुरुंग विभागात तुरुंगातून चालणार्‍या अवैध प्रकारांना प्रतिबंध करण्यात आले.

वरील धाडसी व धडाडीचे निर्णय हे केवळ फडणवीस हे एक परिपक्व राजकारणी असल्यामुळेच शक्य झाले. पोलीस अधिकार्‍यांच्या चांगल्या हेतूने घेतलेल्या निर्णयांमागे फडणवीस खंबीरपणे उभे रहायचे धाडस दाखवत असत. दिवसभर काम करून रात्री दोन वाजे पर्यंत काम करायचे व आलेल्या प्रत्येक संदेशाला त्वरीत उत्तर द्यायचे हा फडणवीस ह्यांच्यातील विशेष गुण आहे. जनसामान्यांचे प्रश्न संवेदनाशीलपणे हाताळणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राखून विकासाला चालना देणार्‍या देवेंद्र फडणवीस ह्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्व शुभेच्छा!

———————————   ——————————